पेज

११ मे, २०२४

अरे माणसा माणसा कधी होशील माणूस!!!

पूर्वीचे लोक म्हणायचे चार पैसे कमी कमवा, मात्र आयुष्यात माणसं जोडायला कमी पडू नका! कारण वेळेला पैसा नाही, माणसं कामी येतात. तुमच्या घरात माणसांची वर्दळ तुमची माणुसकी दर्शवते! मला पटतं ते.. आणि मी लहानपणापासून अशी माणुसकी जपणारी लोकं घरात बघत आली आहे. म्हणून माझा अजूनही माणुसकी आणि चांगुलपणावर विश्वास आहे. 


याचा अर्थ असा नाही, काम सोडून माणसं जोडत बसलायत. करायचं काय मग?? आपुलकी आणि निस्वार्थपणा माणसांना आपलंसं करतो. मात्र, आपुलकीच कालबाह्य होत चाललीय असं वाटतंय.


आपण अशा जगात जगतोय जिथे सोशल मीडियामुळे आपण नको तितके जवळ आहोत. मात्र, एकमेकांच्या आयुष्यात काय चाललंय हे ऐकायला आपल्याला इंटरेस्ट नाही. तितके पेशंस नाहीत. का?? तर आपल्याला रिल्स बघायचे असतात. तिथे रिलेटबल कंटेंट कन्स्युम करायचा असतो. प्रत्येकाला जाणवतंय आपण आतून किती पोकळ बनत चाललोय, किती एकटे पडत चाललोय….


पण यावर उत्तर म्हणून आपण जवळच्या लोकांना बोलणं हा पर्याय विचारात देखील घेत नाही! माणसांनी प्रत्यक्ष भेटणं, बोलणं, गोष्टी शेअर करणं क्रींज का वाटतंय?? मैत्री आणि ओळखी रील्स पुरत्याच का राहिल्यात?? बरं इतकं बिझी तर कोणीच नाही की आठवड्यातून, पंधरा दिवसातून आपल्या जवळच्या लोकांना भेटून बोलू शकणार नाही.आणि हे प्रत्येकाला माहित आहे.. पण आपल्याला सवय झाली आहे असं जगायची. This is new normal ना?? पण का?? 


माणूस हा भावना, वाचा, भाषा या बाबतीत सगळ्यात प्रगल्भ आहे म्हणतात. सगळ्यांत विकसित प्राणी माणसाला म्हणतात… तर मग त्या भावना, भाषा, वाचा वापरणं हे जास्त रिलेटेबल किंवा योग्य का नाही वाटत आपल्याला??? बरं असंही नाही की असे जगण्यात आपण खूप खुश आहोत. विचारा स्वतःला… असाल खुश तर खूपच छान!


कधी विचार केलाय का की, आपल्याला शाळा आणि कॉलेजचे दिवस का परत यावेसे वाटतात? कारण, तिथे रीलस् पुरती मैत्री आणि सोशल मीडियाच्या आड भावनांची घुसमट, एकटेपणा नव्हता. 


यातही दोन प्रकारची लोक आहेत.. काहींना वाटतं छान आहे असंच आयुष्य. मी माझं जगू शकते. कोणाचं मला ऐकून घ्यावं लागत नाही, मी माझं आयुष्य हँडल करते, एकटी सगळ सांभाळते, मी स्ट्रॉंग होत चाललेय.. पण का एकटेपणात आनंद आणि strong असल्याची भावना निर्माण होतेय? मूळ माणूस असण्याचं लक्षण आहे की, माणूस हा सामाजिक प्राणी आहे.. ग्रुप मध्ये राहणं, एकत्र राहणं माणसाचा पिंड आहे… तोच अलीकडे हरवत चाललाय… 


आणि यामुळे दुसऱ्या प्रकारचे जे लोक आहेत, ज्यांना आपल्या जवळचे लोक असावे वाटतात. प्रत्यक्ष भेटणं, बोलणं त्यांचं आसपास असणं त्यांना छान आणि सिक्युअर वाटतं, म्हणून ते प्रयत्न करतात भेटण्याचा बोलण्याचा. अर्थात जर रिस्पॉन्स कसा मिळाला नाही, तर वेदना, दुःख होतं. त्यामुळे जे सांगायचं, बोलायचं असतं ते इग्नोरंसच्या भीती पोटी अजूनच खोलवर जाऊन बसतं. भावनांच्या भारा खाली आधीच अर्धमेल्या व्यक्तीला टाळलं गेलं तर पुन्हा तितकं धाडस करून जगासमोर व्यथा सांगायला उभं राहणं अवघडं जातं.. पुन्हा कोणाला बोलण्याची, काही सांगण्याची इच्छाच मरते… विचारांचा ढिगारा मनावर ओझं बनू लागतो… आणि त्यातूनच एकटेपणा जाणवतो.. पुढे depression येतंच…


का झालो आपण असे??? इतक्या प्रायोरिटी का बदलल्या आपल्या??? माणुसकी, चांगुलपणा, आपुलकी प्रत्यक्षात का नाही दिसत??? 


Reels वर एखादा शायर, कवी त्याचं दुःख सांगतो तेव्हा त्याच्याबद्दल किती sympathy, empathy वाटते ना? तो सांगतो तेच दुःख तुमच्या मित्राला, मैत्रिणीला पण आहे… एवढंच काय, तुम्हालाही असेल ते दुःख… ते रील शेअर करण्यापेक्षा जे वाटतंय ते शेअर करा की कोणालातरी… कोण जाणे तुमच्या बोलण्याने समोरच्या व्यक्तीलाही बळ येइल! काही सांगेल ती व्यक्ती ही मनातल्या गोष्टी! ऐका…,धीर द्या…,मदत घ्या…, वाईट काय आहे त्यात?? 


पूर्वीचे लोक इतके आनंदी का होते माहितीय? कारण ते सुख दुःखात एकटे नव्हते. शेजारीपाजारी, नातेवाईक सुखदुःख वाटून घ्यायचे. ज्यामुळे, सुखाचा गुणाकार आणि दुःखाचा भागाकार व्हायचा! पण आपण आपल्या इन्स्टा अकाउंट सारखं लाईफ पण इतकं प्रायव्हेट केलं आहे की, ना कोणाला आपलं दुःख कळतं.., ना कोणी आपल्याला त्यांचं दुःख सांगू शकतं…!


माणूस माणसापासूनच नाही तर माणुसकी पासून ही दूर चालला आहे… ज्यांना योग्य वाटतं त्यांचं ठीक आहे… मात्र ज्यांना अजूनही जुन्या लोकांची नाती, त्यांचं प्रेम जिव्हाळा याबद्दल कौतुक वाटतं, तसंच जगावंस वाटतं त्यांची मात्र आज घुसमट होत आहे.. नाही बघवत नाती तुटताना, रोज भेटणारी, बोलणारी माणसं अचानक अनोळखी होताना! 


कुठलंही नातं जपण्यासाठी प्रयत्न करावे लागतात, माफ करावं लागतं, मन मोठं असावं लागतं… पण दुर्दैवाने आपण इतके बिझी झालोय की आपल्याला हे प्रयत्न करायला वेळ नाही, तितका संयम राहिला नाही… देव करो नी लवकरात लवकर माणसाला माणसांची किंमत कळो!


१० जुलै, २०२१

प्रयत्न

 "प्रयत्ने वाळूचे कण रगडिता, तेलही गळे" या उक्तीनुसार आपल्याला अशक्य वाटणाऱ्या गोष्टी, ध्येय शक्य वाटतात जर त्याला प्रयत्नांची जोड असेल.

               माणसाचा जन्म होतो तेव्हापासून त्याच्या मृत्यूपर्यंत एका गोष्टीचे सातत्य अखंड टिकलेले ते म्हणजे "प्रयत्न"! अगदी आईच्या उदरातून बाहेर पडण्यासाठी, पहिले पाऊल टाकण्यासाठी,  आयुष्य सुंदर करण्यासाठी आणि वृद्धापकाळात जगण्यासाठी माणूस प्रयत्नांची शर्थ करतो.

               प्रयत्न म्हणजे काय, फार अवघड नाही. भूक लागल्यावर ताट वाढून घेणे, आरामदायी जीवनासाठी पैसा कमवणे, अडचण आल्यावर त्यातून बाहेर पडणे, श्वास घेण्यासाठी नाकाने हवा घेणे... हे सगळे प्रयत्नच तर आहेत! यावरून प्रयत्नांची व्याख्या करायची झाली, तर आपल्याला असे म्हणता येईल की, "ज्या गोष्टीची/वस्तूची आपल्याला गरज आहे ती गोष्ट/ वस्तू मिळवण्यासाठी आपण केलेली हर एक कृती म्हणजे प्रयत्न." पण प्रयत्न केल्यावरही तीच गोष्ट /वस्तू आपल्याला मिळेल, याची काही शंभर टक्के शाश्वती नाही हा!

               कारण, "प्रयत्ने वाळूचे कण रगडिता, तेलही गळे!" अस म्हणलं आहे म्हणून आपण तेल काढायला गेलो तर ते शक्य नाही..! वाळू ती... बारीक केल्यास भुकटीच होईल. तसेच "प्रयत्नांती परमेश्वर" म्हणून वर्षानुवर्ष देवनामाचा जप केल्यास आपण कल्पिलेल्या रूपात परमेश्वर उभा ढाकला असे होणार नाही!

               मग मतितार्थ काय? मतितार्थ हा... प्रयत्नांती आपल्याला कदाचित इच्छित गोष्ट मिळणार नाही, मात्र आपण केलेल्या प्रयत्नांची योग्य किंमत आणि फळ मिळाल्याशिवाय ही राहणार नाही. प्रयत्नांती परमेश्वर जरी नाही भेटला, तरी त्याला मिळवण्यासाठी एकाग्र झाल्याने स्वतःमधील सदगुण व इतरांतील देवपण पाहण्याचा दृष्टिकोन नक्कीच मिळेल.

                पण प्रयत्न केल्यावर ही काहींना अपयश काहींना यशप्राप्ती होते, यामागे काय कारण असू शकते. याचा विचार करता मला असे वाटते- जी गोष्ट / वस्तू आपण प्राप्त करू पाहतो, त्या बद्दल जर मनात लालसा, स्वार्थ, माज, गर्व, खोटेपणा इत्यादी अवगुणांची चाहूल असेल, तर नकळत आपले लक्ष्य प्रयत्नांवरून ती गोष्ट आपल्याला जे साध्य करून देणार आहे, तिकडे जाते. आणि मग प्रयत्न करूनही अपयश मिळाले असे आपण समजतो.

               उदाहरण..., मला अधिकारी व्हायचय, तर मला वाचन करणे, अभ्यास करणे गरजेचे आहे. अधिकारी झाल्यावर घर, गाडी, पैसा, समाजात उच्च स्थान मिळते हे देखिल मला माहिती आहे. पण जर अभ्यास करताना माझ्या डोक्यात घर, गाडी, समाजातील स्थान या गोष्टी येत असतील, तर समजावे की आपल्या अधिकारी होण्याच्या ध्येयाला अवगुणांची चाहूल चिकटली आहे.

                अर्थात, आपण यावर ही प्रयत्नांनीच मात करू शकतो. शक्य तितक्या निःस्वार्थी भावनेने आपण जेव्हा ध्येय प्राप्तीसाठी प्रयत्न करतो, तेव्हा यशप्राप्ती नक्कीच होते.




१७ जून, २०२१

LGBTQ Community

                शिर्षकतील ही अक्षरं बरेच जण पहिल्यांदा पाहत असतील, वाचत असतील. गोंधळ उडाला असेल ना... काय हे, कसं वाचायच - एल.जी. बी. टी. क्यू कम्यूनिटी सरळ सरळ आहे अस वाचा म्हणा. तर काय हे LGBTOQ= लेस्बियन, गे, बायसेक्शुअल, ट्रान्सजेंडर, क्वीर... तरीही समजन्याइतक सोप्प नाही वाटत का? किंवा तुम्हाला हे शब्द माहिती आहेत पण नक्की अर्थ काय याचा गोंधळ उडाला असेल, असू दया सहाजिक आहे.

          "जगात चांगल्या गोष्टींचा गवगवा करावा आणि वाईट गोष्टी दडपून टाकाव्या" असा एक अलिखित नियम बहुधा कोणी बनवला असावा... अशाच कोणीतर महाभागांनी आपल्या बुद्धीनुसार चांगले काय, वाईट काय हे ठरवून टाकलं... आपण ते ओढत इथेपर्यंत आणलं. देव चांगला म्हणून देवाच्या अक्षरश: 33 कोटी प्रकारांच ओसंडून वर्णन आपल्या संस्कृती रक्षाकांनी केलं. मात्र माणूस विविध प्रकारांचा, वेगळ्या आकाराचा, वेगवेगळ्या निवडीचा, असू शकतो यावर कधी विचार केला? प्रत्येक देवाला नाही का वेगळा नैवेदय लागतो, वेगवेगळी फूलं आवडतात.... माणूसही स्वतः च्या निवडीविषयी स्वतंत्र आहे, त्याला तसा अधिकार आहे. काय खायचं, कोणते कपडे घालायचे, कसे घालायचे इथपासून कोणावर प्रेम करायचं, कोणाशी लग्न करायचं, इथपर्यंत सगळ्या निवडी स्वतः करण्याचा  माणसाचा वयक्तिक हक्क आणि स्वातंत्र्य आहे.

              स्त्री आणि पुरुष या दोन माणसाच्या प्रकारांत जी व्यक्ती बसते तीच माणूस. स्त्री-पुरुष यांनी एकमेकांवर प्रेम करायचं आणि एकमेकांशीच लग्न करायचं. या चौकटी बाहेर जाणाऱ्याला ना समाजात स्थान मिळतं, ना त्याची माणूस म्हणून गणना होते. स्वतःला स्त्री/पुरुष मानणाऱ्या व्यक्तींना जितका प्रतिष्ठा व सन्मानाने जगण्याचा हक्क आहे. बेशक LGBTQ Community मधील प्रत्येकालाही तितकाच हक्क आहे. आपण माणूस म्हणून दुसऱ्या माणसांच्या निवडीवर, स्वातंत्र्यावर, हक्कावर अतिक्रमण करणे अन्यायकारक आहे. याउलट प्रत्येकाला माणूस म्हणून त्याच्या स्वातत्र्यासह जगता येईल अशी परिस्थिती, वातावरण निर्माण करणं आपलं..., माणूसकीचं कर्तव्य आहे. 
              म्हणून LGBTQ community बद्दल माहिती असणे जागरुकता असणे ही गरज आहे, नाही का ?
              तर काय असते LGBTQ community? आपल्याला स्त्रीलिंगी, पुल्लिंगी, नपुंसकलिंगी व्यक्ती फार तर माहित असतील. अगदी त्याचप्रमाणे Lesbien, gay, Bisexual, Transegender, Queer  हे नविन शब्द, नविन प्रकार यात Add झाले आहेत अस म्हणा हव तर.

 L= लेस्बियन किंवा समलिंगी स्त्रिया ~ सामान्य मुलींसारख्या मुली, सोप्या भाषेत सांगायच झालं, तर ज्या मुलींना मुली आवडतात, अशा. आता यात दोघींपैकी एक पुरुषा सारखी राहत असेल, वावरत असेल असं काही नसतं.

G= गे किंवा समलिंगी पुरुष ~ जेव्हा पुरुष पुरुषाकडे आकर्षित होतो, त्यांना म्हणतात किंवा एकंदरच "LGBTQ" ला देखिल गे असं संबोधले जाते.

B= बायसेक्शुअल किंवा उभयलिंगी ~ एखादया व्यक्तिला स्त्री व पुरुष दोघांबद्दल आकर्षण वाटते. त्यांना बायसेक्शुअल म्हणतात.

T= ट्रान्सजेंडर किंवा तृतीयपंथी ~ जन्मतः मुलगा किंवा मुलगी असतात. मात्र मोठे झाल्यावर त्यांच्या लक्षात येते की आपले मन आणि शरीर दोन्ही एकमेकांविरुद्ध आहेत. शरीराने मुलगा असणाऱ्या व्यक्तीस मुलींसारखं राहावं, वागावं, बोलावसं वाटतं. तर मुलीचे शरीर असणाऱ्या व्यक्तीला पुरुषांप्रमाणे राहावं, वागावसं वाटतं, यांना म्हणतात तृतीयपंथी.
                 आता जी पुरुषाचा देह असणारी व स्त्रीचे मन असणारी व्यक्ती जेव्हा साडी, ड्रेस, स्त्रियांचे कपडे घालते किंवा याउलट मन पुरुषासारखं व देह स्त्रीचा जेव्हा पुरुषांसारखे कपडे घालतात, त्यांना, ट्रान्सजेंडर क्रॉस ड्रेसर म्हणतात.
                तर काहीजण मन व शरीर यांचा मेळ घालण्यासाठी Harmonal  Replacement Therapy किंवा sex Reassignment  surgeries द्वारे बदल करून घेतात पण यांचे sexual Preference ही  Lesbian, bisexual, gay किंवा straight काहीही असू शकतात.

I= Inter-sex किंवा आंतरलिंगी ~  जन्मा वेळी Genital (जननेंद्रिये) वरून एखादी व्यक्ती स्त्री आहे की पुरुष हे सांगणे अवघड असते, तेव्हा डॉक्टर योग्य वाटणाऱ्या  Sex चं ते मूल असल्याचे जाहीर करतात. त्यामुळे Inter sex. व्यक्ती देखिल मोठे होऊन LGBTQ यांपैकी कोणीही बनू शकतात.

Q = Queer- ज्या व्यक्तींना अजून कळलेलच नसत, की आपण नक्की LGBT यांपैकी काय आहोत, आपण कोणाकडे आकृषित होतोय, त्यांना Queer किंवा questioning म्हणतात.

LGBTQ Flag


               ही झाली केवळ LGBTQ बाबतची तोंडओळख किंवा Terminology. खरे प्रश्न तर पुढे आहेत, यांच्या हक्काचे, स्वातंत्र्याचे, अस्तित्वाचेच म्हणा ना. 
              येणाऱ्या blog मधून आपण ते जाणून घेण्याचा प्रयत्न करू. जर याबाबत काही प्रश्न असतील तर comments मध्ये विचारा. पुढील blog मध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करेन.

१५ जून, २०२१

पाऊस

प्रत्येक थेंबाचा शब्द घेऊन येतो ,
टप्पोऱ्या तालाच गाणं गातो तो...
आईप्रमाणे  फुलवेलींच्या पाना-पानाला  बिलगतो,
धारित्रीची  महिन्यांची धग शमवतो तो...
रडवेल्याच्या  डोळ्यातील धारा होतो ,
खुशालीच्या आनंदी सरी होतो तो...
जोडप्यातील दुवा होतो,
एकट्याचा प्रियकर होतो तो...
कवीची कविता होतो,
साहित्याचा शृंगार होतो तो....
प्रत्येकाचा दोस्त होतो,
ज्याला त्याला आपलाच वाटतो तो...!

       


पाऊस वेड आहे, आनंदी असणाऱ्याला नाचायला लावणारं गाणं वाटतो हा पाऊस...., दुःखी असणाऱ्याला त्याच्या अश्रूंचा बांध वाटतो पाऊस...., प्रियकराला प्रिययसीची मिठी वाटतो पाऊस....., लेखकाला त्याच्या लेखणीची शाई वाटतो हा पाऊस....,वेड्याला त्याचं वेडचं वाटतो हा पाऊस....!!!!


कित्येक कवी, दिग्गज लेखक आपल्या लेखणीतून याच्यावर कौतुकाचा वर्षाव करतात. पण शब्दात व्यक्त  करण्याच्या पलीकडचा आहे तो... वेड लावतो हा निसर्ग, त्याची सुंदर रूपं... रात्रीचं निखळ चांदणं..., चंद्राच्या कला..., त्याच्या सौंदर्यापूढे  दिवसभराचा गोंधळ जणू अंधारात विरून जातो. दुसऱ्या दिवसाची सोनेरी पहाट... आणि हा पाऊस...,







१३ जून, २०२१

खेकडे

                 इथे पाण्यातला प्राणी खेकडा याविषयी नाही माणसातील प्रवृत्ती - 'खेकडा' याविषयी लिहिलं जातयं. अशा प्रवृत्तीच्या लोकांविषयी  राग बाळगावा की त्यांच्या गरिब मनाची कीव करावी तेच कळत नाही. 

               कामाच्या ठिकाणी, मित्र-मैत्रिणींमध्ये, शेजारी, घरात, नातलगात, समाजात अक्षरश: सगळीकडे हे लोक तुम्हाला दिसतील. स्वतःच्या आयुष्याला योग्य दिशा मिळावी, जीवन समाधानाने जगता यावं, आपलं ध्येय शोधावं, त्याचा मार्ग निवडावा, आपल्याकडून आपल्या माणसांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण कराव्या, निदान हे सगळं करण्याचा प्रयत्न तरी करावा... या वेडापायी  माणूस धडपडत असतो, प्रवास करत  असतो. मात्र दुसऱ्याची प्रगती बघवेल ते खेकडे कसले..., नांगी उंचावून, पाय ओढणे, अडथळे घालणे हाच तर गुणधर्म त्यांचा! 

              स्वतः गाळात रुतून राहायचं, बाहेर पडण्याचा प्रयत्न देखील करायचा नाही व दुसऱ्यालाही गाळातून वर येऊ दयायचे नाही. कसला कपटीपणा म्हणायचं याला!!!                              

             बरं...,आणि मग, जो स्वतःला गाळातून बाहेर काढू शकत   नाही, स्वतःचीच मदत करू शकत नाही, त्यांच्यावर राग तरी कसा धरायचा??? निष्क्रीय, कपटी, खुळचट, गरिब अन् अशा आजारी मनोवृत्तीची करावी तेवढी कीव कमीच नाही का ??? 

               त्यामुळे खेकडयांकडे लक्ष न देणंच चांगल. कारण "निंदकाचे घर असावे शेजारी" या नुसार जर आपण खेकडा निंदक म्हणून पाळला.... तर तो त्याच्या गुणधर्माप्रमाणे आपल्याला गाळात दाबूनच मारणार!!! निंदक हा आपल्यातील दोष, चुका सांगणारा असावा ज्यात सुधारणा करून आपण प्रगतीच करु. मात्र खेकड्या सारखा निंदक.... आपली प्रगती सोडा, आहे ती गती, स्थिती ढासळवायला असतो, हे वेळीच कळलं पाहिजे.

                आपली अडवणूक करून खेकडयाचा हेतू साध्य होतो, त्यामुळे त्याला ओलांडून जाता आलंच पाहिजे.

                आपल्या घरातून, शाळेतून "एखादयाच कौतुक होणं, चांगल होण, आपल्याला बघवत नसेल, तर त्याविषयी निदान वाईट चिंतू नये" असा संस्कार नक्कीच झालेला असतो. त्यामुळे एखादयाची प्रगती इतकीच खुपत असेल डोळ्यात, तर आपण आपला मार्ग बदलावा... किंवा त्याच्यापेक्षा जास्त प्रगती करावी. मात्र खेकड्यसारखं पाय ओढून माणुसकीची अब्रू वेशीवर आणू नये.

इस्राईल- Palestine

      हिटलरने ज्यू धर्मीयांचा कसा छळ केला, घृणास्पद वागणूक दिली  हे आपण जाणतो. मात्र ज्यूंविषयी हे अत्याचार वर्षानुवर्षांपासून  चालत आलेत. म...

Most viewed