पूर्वीचे लोक म्हणायचे चार पैसे कमी कमवा, मात्र आयुष्यात माणसं जोडायला कमी पडू नका! कारण वेळेला पैसा नाही, माणसं कामी येतात. तुमच्या घरात माणसांची वर्दळ तुमची माणुसकी दर्शवते! मला पटतं ते.. आणि मी लहानपणापासून अशी माणुसकी जपणारी लोकं घरात बघत आली आहे. म्हणून माझा अजूनही माणुसकी आणि चांगुलपणावर विश्वास आहे.
याचा अर्थ असा नाही, काम सोडून माणसं जोडत बसलायत. करायचं काय मग?? आपुलकी आणि निस्वार्थपणा माणसांना आपलंसं करतो. मात्र, आपुलकीच कालबाह्य होत चाललीय असं वाटतंय.
आपण अशा जगात जगतोय जिथे सोशल मीडियामुळे आपण नको तितके जवळ आहोत. मात्र, एकमेकांच्या आयुष्यात काय चाललंय हे ऐकायला आपल्याला इंटरेस्ट नाही. तितके पेशंस नाहीत. का?? तर आपल्याला रिल्स बघायचे असतात. तिथे रिलेटबल कंटेंट कन्स्युम करायचा असतो. प्रत्येकाला जाणवतंय आपण आतून किती पोकळ बनत चाललोय, किती एकटे पडत चाललोय….
पण यावर उत्तर म्हणून आपण जवळच्या लोकांना बोलणं हा पर्याय विचारात देखील घेत नाही! माणसांनी प्रत्यक्ष भेटणं, बोलणं, गोष्टी शेअर करणं क्रींज का वाटतंय?? मैत्री आणि ओळखी रील्स पुरत्याच का राहिल्यात?? बरं इतकं बिझी तर कोणीच नाही की आठवड्यातून, पंधरा दिवसातून आपल्या जवळच्या लोकांना भेटून बोलू शकणार नाही.आणि हे प्रत्येकाला माहित आहे.. पण आपल्याला सवय झाली आहे असं जगायची. This is new normal ना?? पण का??
माणूस हा भावना, वाचा, भाषा या बाबतीत सगळ्यात प्रगल्भ आहे म्हणतात. सगळ्यांत विकसित प्राणी माणसाला म्हणतात… तर मग त्या भावना, भाषा, वाचा वापरणं हे जास्त रिलेटेबल किंवा योग्य का नाही वाटत आपल्याला??? बरं असंही नाही की असे जगण्यात आपण खूप खुश आहोत. विचारा स्वतःला… असाल खुश तर खूपच छान!
कधी विचार केलाय का की, आपल्याला शाळा आणि कॉलेजचे दिवस का परत यावेसे वाटतात? कारण, तिथे रीलस् पुरती मैत्री आणि सोशल मीडियाच्या आड भावनांची घुसमट, एकटेपणा नव्हता.
यातही दोन प्रकारची लोक आहेत.. काहींना वाटतं छान आहे असंच आयुष्य. मी माझं जगू शकते. कोणाचं मला ऐकून घ्यावं लागत नाही, मी माझं आयुष्य हँडल करते, एकटी सगळ सांभाळते, मी स्ट्रॉंग होत चाललेय.. पण का एकटेपणात आनंद आणि strong असल्याची भावना निर्माण होतेय? मूळ माणूस असण्याचं लक्षण आहे की, माणूस हा सामाजिक प्राणी आहे.. ग्रुप मध्ये राहणं, एकत्र राहणं माणसाचा पिंड आहे… तोच अलीकडे हरवत चाललाय…
आणि यामुळे दुसऱ्या प्रकारचे जे लोक आहेत, ज्यांना आपल्या जवळचे लोक असावे वाटतात. प्रत्यक्ष भेटणं, बोलणं त्यांचं आसपास असणं त्यांना छान आणि सिक्युअर वाटतं, म्हणून ते प्रयत्न करतात भेटण्याचा बोलण्याचा. अर्थात जर रिस्पॉन्स कसा मिळाला नाही, तर वेदना, दुःख होतं. त्यामुळे जे सांगायचं, बोलायचं असतं ते इग्नोरंसच्या भीती पोटी अजूनच खोलवर जाऊन बसतं. भावनांच्या भारा खाली आधीच अर्धमेल्या व्यक्तीला टाळलं गेलं तर पुन्हा तितकं धाडस करून जगासमोर व्यथा सांगायला उभं राहणं अवघडं जातं.. पुन्हा कोणाला बोलण्याची, काही सांगण्याची इच्छाच मरते… विचारांचा ढिगारा मनावर ओझं बनू लागतो… आणि त्यातूनच एकटेपणा जाणवतो.. पुढे depression येतंच…
का झालो आपण असे??? इतक्या प्रायोरिटी का बदलल्या आपल्या??? माणुसकी, चांगुलपणा, आपुलकी प्रत्यक्षात का नाही दिसत???
Reels वर एखादा शायर, कवी त्याचं दुःख सांगतो तेव्हा त्याच्याबद्दल किती sympathy, empathy वाटते ना? तो सांगतो तेच दुःख तुमच्या मित्राला, मैत्रिणीला पण आहे… एवढंच काय, तुम्हालाही असेल ते दुःख… ते रील शेअर करण्यापेक्षा जे वाटतंय ते शेअर करा की कोणालातरी… कोण जाणे तुमच्या बोलण्याने समोरच्या व्यक्तीलाही बळ येइल! काही सांगेल ती व्यक्ती ही मनातल्या गोष्टी! ऐका…,धीर द्या…,मदत घ्या…, वाईट काय आहे त्यात??
पूर्वीचे लोक इतके आनंदी का होते माहितीय? कारण ते सुख दुःखात एकटे नव्हते. शेजारीपाजारी, नातेवाईक सुखदुःख वाटून घ्यायचे. ज्यामुळे, सुखाचा गुणाकार आणि दुःखाचा भागाकार व्हायचा! पण आपण आपल्या इन्स्टा अकाउंट सारखं लाईफ पण इतकं प्रायव्हेट केलं आहे की, ना कोणाला आपलं दुःख कळतं.., ना कोणी आपल्याला त्यांचं दुःख सांगू शकतं…!
माणूस माणसापासूनच नाही तर माणुसकी पासून ही दूर चालला आहे… ज्यांना योग्य वाटतं त्यांचं ठीक आहे… मात्र ज्यांना अजूनही जुन्या लोकांची नाती, त्यांचं प्रेम जिव्हाळा याबद्दल कौतुक वाटतं, तसंच जगावंस वाटतं त्यांची मात्र आज घुसमट होत आहे.. नाही बघवत नाती तुटताना, रोज भेटणारी, बोलणारी माणसं अचानक अनोळखी होताना!
कुठलंही नातं जपण्यासाठी प्रयत्न करावे लागतात, माफ करावं लागतं, मन मोठं असावं लागतं… पण दुर्दैवाने आपण इतके बिझी झालोय की आपल्याला हे प्रयत्न करायला वेळ नाही, तितका संयम राहिला नाही… देव करो नी लवकरात लवकर माणसाला माणसांची किंमत कळो!