पेज

२८ मे, २०२१

आत्म्याशी विद्रोह....???

एकदा सर्व नाती तोडून

एकटीनेच जगायच ठरवलं... 

माझ्या सग्यासोयऱ्यांशी

मीच बंड केलं! म्हटलं दयाव सगळ सोडून...,

तितक्यात मनातल एक दार उघडलं

आतल्या दृश्यानं, जणू मनचं जिंकलं!

       एक पाऊल आपसुकच आत पडलं,

       वातावरण गजबजलेले...

       बाया-बापड्यांनी भरलेलं, 

       पुष्पहारांनी सजवलेलं,

       सुगंधाने दरवळणारं,

       चिमुकल्या स्वरांनी किलबिलणार,

       सनई-चौघडयांनी दुमदुमूणार...

       त्याच्या तालावर मध्येच डुलणार! 

       मिष्टानांच्या मधूर लाटेबर, घरभर फिरणार,

       आनंदाच्या झोक्यावरून, मनसोक्त हिंदोडणारं!!!

अगदी इन्द्रदरबारातील सूखवास्तू सोहळाच जणू....!

       बेफाम निसर्गसौंदर्यात भर टाकण्यासाठी 

       भूमातेच्या पाठीवर पाय रोवून आलेल्या

       चिमुकलीच्या जन्म स्वागताचा सोहळा...!

अचानक दुसरीकडून...,

       काळीज चिरणारा

       मनाला भेडसावणारा, 

       कानशीलांवर आदळून

       त्याच्या ठिकऱ्या-ठिकऱ्या करणारा ,

       हा जहरी, भेसूर, बेबंध, उन्मत्त, 

       कर्कश्श आक्रोश......???

कसला होता तो.......???

माझ्या आत्म्याचा....,

       चिमुकलीच्या देहाशी झालेल्या मिलापाचा सोहळा,

अन्...

       माझ्या देहापासून काडीमोड झाल्याचा विद्रोह होता तो...!!!

Photo by-pallavi


२६ मे, २०२१

मुलगी वयात येताना...!

      एकीकडे परिवर्तनाची कास धरून वाईटाला विरोध आणि योग्य गोष्टीला सामर्थ्य पुरवत मौनांची अंतरे पार करू पाहणारी संवेदनशील लोकांची फळी आहे ,तर दुसरीकडे याच संवेदना पायदळी तुडवत पुरुषी अहंकार अन अज्ञानाचा नंगा नाच सुरु आहे.

     अशा वेळी खरी कसोटी असते ती या दोघांच्या मधल्या फळीची.एकीकडे तुमच्या ज्ञानाची, सहनशीलतेची, स्वाभिमानाची परीक्षा, तर दुसरीकडे विकृतींचं व कुबुद्धीचं मनोरंजन. तुमच्या हातात असतं तुम्ही त्या परिस्थितीत मूग गिळून, मठ्ठपणे, निर्बुद्धपणे सगळं पाहत राहायचं की माणसाचं लक्षण ओळखून, माणुसकीला जागून, अन्याय-अत्याचाराविरुद्ध स्वतःला सिद्ध करायचं!
     भले मग अशा वेळी वाटेत काटे येतील,नव्हे वाटच काटेरी असेल! तेव्हा निर्धार, विश्वास, सहनशक्तीच्या फांद्या इतक्या मोठ्या करा की काटेरी वाटाही झुकतील! सगळे जेव्हा या वाटांवरून जातील, तेव्हा काटेच बोथट होऊन जातील!!!
     म्हणून अशा काटेरी, न वापरलेल्या जाणाऱ्या, अंधाऱ्या, वाईट समजल्या जाणाऱ्या वाटा पायाखाली आल्या की, होणारच-सुरळीत, मऊ, मखमली!!!
सांगण्याचा मतितार्थ हाच की, समाजातही अशा काही गोष्टी, रूढी,( गैर) समज आहेत, ज्यावर वर्षानुवर्षे मौनाचे व्रत चालू आहे. त्यामुळेच या गोष्टींबद्दल "काटेरी वाटांप्रमाणेच" गैरसमजुती अन myth पसरले आहेत.
     परंतु आज या वाटा पूर्ववत करण्यासाठी अनेक वाटाडे सज्ज होऊन मार्गस्थ झाले आहेत. यातील एक वाट जाते, "महिलांच्या मासिक पाळी" कडे! मुळात याबद्दल पहिला मुद्दा म्हणजे किती विरोधाभास बघ ना, प्रत्येक महिन्याला या वाटेवरून जाऊनही या वाटेवर ही अविचाराची जळमटे का??
     स्त्रीच्या शरीरातील अंडपेशींचे फलन न झाल्यास ही अफलीत अंडपेशी रक्त व म्युकस सहित स्त्रावाच्या स्वरूपात गर्भाशयाबाहेर टाकली जाते. ही प्रक्रिया 3-5 दिवसांची असू शकते. आणि हि नैसर्गिक प्रक्रिया म्हणजेच मासिक पाळी.
     ज्याप्रमाणे आपले शरीर वेगवेगळ्या दैनंदिन क्रिया-प्रक्रियांना प्रतिसाद देत असते, जसे पचन, रक्ताभिसरण, श्वसन याचप्रमाणे मासिक पाळी ही केवळ एक, स्त्रियांच्या शरीरात होणाऱ्या बदलांची क्रिया आहे..!
     मात्र याकडे आपल्या अज्ञानी समाजाने एक अपवित्र गोष्ट म्हणूनच पहिले. मासिक पाळी चालू असणाऱ्या महिलेला केवळ अवहेलना, कुचेष्टा, लाजिरवाणी वागणूक आणि दुर्लक्षितपणा हेच भोगावे लागते. 4दिवसात जेव्हा तिच्या आरोग्याची काळजी घेणे, स्वच्छता राखणे गरजेचे असते, तेव्हा तिला घराच्या एखाद्या न वापरल्या जाणाऱ्य, अस्वच्छ, अंधाऱ्या, कुबट कोपऱ्यात टाकले जाते. या 4 दिवसात तिने जवळ जवळ घरच्यांशी संबंधच ठेवायचा नसतो म्हणा ना....
     आणि हेच सारं विटाळाच अनिष्ठ पाळत आपण आजवर जगत आहोत. या गोष्टीच गांभीर्य कधी आपण मानलच नाही. मासिक पाळीच्या वेळी, ती सुरु होण्यापूर्वी मुलींना त्याबद्दल माहिती करून देणे, आरोग्य व स्वच्छतेबाबत काळजी कशी घ्यावी याबाबत मार्गदर्शनाची गरज असते... पण आपल्या समाजाच्या या उलट्या गंगेत मात्र, याबाबत गुप्तता कशी पाळावी, हे सगळं कसं अपवित्र आहे, यासंबंधी चालीरीती कित्ती कटाक्षाने पळवायला हव्यात याचीच सुमने वाहिली जातात, ही एक दुर्दैवाचीच गोष्ट....!
     पहिल्यांदा जेव्हा एखाद्या नकळत्या मुलीला पाळी येते, तेव्हा तिच्या मनात अनेक प्रश्नांची काय घालमेल होत असेल....याच्या विचारानेच मन कासावीस होते. योनीमार्गातून अचानक त्रासदायकपणे रक्तस्त्राव होणे म्हणजे आपल्याला काही महाभयंकर आजार झाला आहे का?, आपण प्रेग्नेंट तर नाही ना????  अशा प्रश्नांनी हैराण होऊन जात असेल ती.....
     अशा वेळी गरज असते त्या मुलीला तिच्या सोबत होत असलेल्या शारीरिक बदलांची जाणीव व माहिती करून देण्याची. आणि ही जबादारी असते, तिचा त्या वयातला ज्ञानाचा स्रोत असणाऱ्या शाळा, घर, नातेवाईक किंवा एकूणच अनुभवकर्त्यांची. मात्र.... आपल्याकडे या विषयावर घरातच काय, कुठेही बोलने अगदी निशीद्ध!!! उपाय म्हणून शालेय विज्ञानाच्या अभासक्रमात मासिक पाळीचा भाग समाविष्ट केला, तर शिक्षकांनी रुढींच्या कर्तव्य पालकांप्रमाणे अगदी इमानदारीने हा भाग शिकवण्यातून गाळून टाकला! केवढी मोठ्ठी ही शोकांतिका आपल्या शिक्षण व्यवस्थेची...
      महिलांना बरेच आजार हे मासिक पाळीच्या वेळी स्वच्छता न राखल्याने किंवा त्याबद्दल पुरेशी माहिती नसल्याने होतात. यातून पुढे जाऊन महिलांना गर्भाशय काढून टाकणे वगैरे अशा गोष्टींना सामोरे जावे लागतते. त्यामुळे स्त्रियांचे आयुष्य वाढवायचे असेल, त्यांना प्रगतीचा मोठा भागीदार बनवायचे असेल, तर त्यांच्या आयुष्याचा मोठा भाग असणाऱ्या मासिक पाळीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
     याची सुरुवात घरातूनच झाली पाहिजे. घरातील पुरुषांनाही याबद्दल माहिती असली पाहिजे. तुमच्या घरात जेव्हा तुम्ही तुमच्या नव्याने मासिक पाळी चालू होणाऱ्या मुलीला याबद्दल माहिती देता, तेव्हा मुलाला देखील त्याबद्दल संगण्याइतपात मोकळीक,समज आता यायला हवीच. कारण, असे दिसून येते की बऱ्याच पुरुषांच्या नजरेत मासिक पाळी म्हणजे-स्त्रियांचा विषय, एक आजार, दुर्लक्ष करण्याचा विषय, न बोलणेच बरे...वगैरे वगैरे असं आहे....
     या दृष्टिकोनाला जबाबदार कुठेतरी स्त्रीयादेखील आहेत. कारण,एखादी गोष्ट तुम्ही जितकी लपवून, रहस्यमय ठेवता तेव्हा त्याबद्दल कुतूहल किंवा अनर्थ निर्माण होणारच. आणि त्यातूनच मग अशा गैरसमजांचे पेव पसरत जातात. दुसरी गोष्ट म्हणजे पुरुषांनीही दृष्टिकोन बदलून याकडे गांभीर्य, जाणीव, संवेदनशीलतेने बघणे गरजेचे आहे.
     अर्थात परिस्थिती बदलत आहे, वाट बऱ्यापैकी साफ झाली आहे मात्र अजूनही पूर्ण नाही! मुलींनीही girls problem, secrets म्हणून हया बद्दल बोलणे टाळणे टाळावे. कारण ही गुप्तता दूर झाल्याशिवाय मासिक पाळी व त्यासंबंधित आरोग्य, स्वच्छता,आजार याबद्दल मुक्त चर्चा होणारच नाही....म्हणून या सामान्य गोष्टीला जे असमान्यतेचे आवरण चढले आहे ते दूर करून, 'स्त्रीला'- पुरुष व स्त्रिया दोघांनीही 'मासिक पाळीसह' स्वीकारणे आवश्यक आहे......!

Photo curtecy-Akanksha mote


२४ मे, २०२१

इस्राईल- Palestine

      हिटलरने ज्यू धर्मीयांचा कसा छळ केला, घृणास्पद वागणूक दिली  हे आपण जाणतो. मात्र ज्यूंविषयी हे अत्याचार वर्षानुवर्षांपासून  चालत आलेत. म्हणजे हजारो वर्षात क्वचितच इतका आकस इतर कोणत्या धर्माने अनुभवला असेल. 

     19व्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत आपला स्वतंत्र देश असावा अशी भावना ज्यूंमध्ये निर्माण झाली होती व काही संघटना या विचाराचा प्रसार देखील करत होत्या. या संघटना स्वतः ला "lovers of zion" म्हणवून घेत. यासारख्या कारणांमुळेच 1981 मध्ये ज्यूंचे मोठया प्रमाणात Palestin मध्ये स्थलांतर झाले. कारण, Palestine मधील जेरुसलेम हे ज्यूंसाठी सर्वात पवित्र धार्मिक स्थान आहे.

           


त्याकाळी Palestine ऑटोमन साम्राज्याचा भाग होते. जेथे मुस्लीम, ख्रिश्चन, ज्यू तिन्ही धर्मीय आनंदाने वास्तव्यास होते. जेरुसलेम हे या तिनही धर्मीयांसाठी महत्वपूर्ण शहर असल्याने यावर ताबा मिळवण्यासाठी देखील संघर्ष हा होताच.

 

        

        1 ल्या महायुद्धाच्या काळात झालेल्या 3 करारांनी या प्रदेशातील संघर्ष आणखी चिघळला गेला.
◆ब्रिटन व अरब यांच्यातील मॅकमोहन-हुसेन करार = ऑटोमन तुर्कना हारवण्यासाठी मदत केल्यास ब्रिटिशांनी अरबांना palestine देण्याचे वचन दिले.
◆ब्रिटन व ज्यू यांच्यातील Balfour decleration= ज्यूंना स्वतंत्र देश हवा होता.अरबांप्रमाणेच ब्रिटिशांनी ज्यूंनाही palestin देण्याचे वचन दिले.


◆ ब्रिटन व फ्रान्स यांच्यातील Sykes-picot agreement=  यांच्यात गुप्त करार झाला. त्यानुसार ऑटोमन 1ल्या महायुद्धात हारले तसे ऑटोमन प्रदेश ब्रिटन व फ्रान्समध्ये विभागला व पॅलेस्टीन ब्रिटनकडे आले.
        आणि अशाप्रकार 1917 ते 1948 पर्यंत Palestin ब्रिटीश नियंत्रणात  होता.

     जर्मनीत ज्यावेळी हिटलरच्या हाती राजकीय सत्ता आली, त्याने ज्यूंची हत्या चालू केली. आश्रयासाठी ज्यू विविध देशांत गेले. बरेच जण  Palestinला आश्रयासाठी गेले. सुरुवातीला ब्रिटनने आश्रय दिला. मात्र, नंतर palestin वर वर्चस्व असलेल्या ब्रिटनने ज्यू लोकांना प्रवेश नाकारला. ज्यामुळे Israel nationalist moment चालू झाली. स्वतंत्र ज्यू राष्ट्राची मागणी जोर धरू लागली आणि परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे कळताच ब्रिटनने हात वर केले ही जबाबदारी संयुक्त राष्ट्र संघटनेकडे गेली. 

            United Nations Partition Plan 1947, नुसार संयुक्त राष्ट्र


(UN)ने या प्रदेशाचे पुढीलप्रमाणे विभाजन केले. 43% -अरबांना, 53% - ज्यू लोकांना, तर, जेरुसलेम आंतरराष्ट्रीय नियंत्रणाखाली राहील असे ठरले.
        याप्रकारे 1948 ला Israel निर्माण झाले. हे अरब राष्ट्रांना मान्य नव्हते. त्यामुळे अरब राष्ट्रांनी इस्त्राईस विरुद्ध युद्ध पुकारले. 5 पेक्षा जास्त राष्ट्रांनी एका नवीन निर्माण झालेल्या देशाविरुद्ध आरंभलेले हे युद्ध, यात आश्चर्यकारकपणे इस्त्राईलचा विजय होतो. इस्त्राईल या युद्धानंतर Pertition Plan नुसार Palestine च्या असणाऱ्या भागांवर मिळवतो. यावेळी West bank प्रदेश जॉर्डनकडे आणि Gaza Strip प्रदेश इजिप्तकडे होता. आणि मूळ पलेस्टिनी लोक मात्र स्वतःच्या देशा अभावी इतर अरब राष्ट्रांमदे विखुरले गेले होते.
     Israel ला विरोध करण्यासाठी पलेस्टिनी लोकांनी संघटना उभारली - Palestine Liberation Organization (PLO)(फतेह) सुरुवातीला UN ने ही दहशतवादी संघटना असल्याचे जाहीर केले. मात्र 1988 ला पलेस्टिनी लोकांचे प्रतिनिधित्व करणारी संघटना म्हणून PLO ला UN चा पाठिंबा मिळाला.
     दुसऱ्या महायुद्धात इस्लाईलने पूर्ण West वर ताबा मिळवला होता. पुढे ज्यू लोक मोठ्या प्रमाणात West bank प्रदेशात वास्तव्यास येऊ लागले. तिथे ज्यूं च्या कायस्वरूपी वसाहती निर्माण झाल्या. ज्या आजतागायत अस्तित्वात आहेत. याला इस्राईल सरकारचा पाठिंबा आहे. मात्र आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार या वसाहती बेकायदेशीर आहेत.
     1948मध्ये इस्त्राईल निर्माण झाला. तेव्हापासून किंबहुना त्याही पूर्वीपासून इस्त्राईल पॅलेस्टिन संघर्ष चालू आहे. दोन्ही देशांमध्ये जेरुसलेम राजधानीचा प्रश्न, निर्वासितांचा प्रश्न, सीमा प्रश्न असे संघर्षाचे अनेक मुद्दे आहेत. यावर शांततेच्या मार्गाने, लष्करी सामर्थ्यादवारे तोडगा काढण्याचे प्रयत्न चालू असतात. त्यातीलच एक- OSLO Accords, 1993. Israel-Palestine च्या शांततापूर्ण विभाजनाचा प्रयत्न. याचा परिणाम म्हणजे Palestinian Nat. Authority द्वारे पहिल्यांदा palestine सरकार स्थापन झाले. पण या प्रदेशात आधीच्या इस्त्राईल वसाहती अस्तित्वात असल्याने प्रशासकीय सोयीसाठी पॅलेस्टिन प्रदेशाचे 3 भाग केले- Area A= palestine नियंत्रण, Area B= दोन्ही सरकारांचे नियंत्रण, Area C= israel नियंत्रण. या विभाजनामुळे प्रत्यक्षात पॅलेस्टीनला 100 हून अधिक तुकड्यांमध्ये आपला देश मिळाला.

     हे कट्टर ज्यूविरोधी लोकांना मान्य होण्यासारखे नव्हते. आणि याच्याच परिणामाखातर जहालवादी हमास संघटना स्थापन झाली. लष्करीदृष्ट्या ताकदवर, विध्वंसक अशी Israel ला विरोध करण्याच्या मूळ हेतूने अस्तित्वात आलेली हमास. UK, UN, US यांनी ही दहशतवादी संघटना असल्याचे जाहीर केले आहे. 2006 ला हमास ने PLO पक्षाला (फतेह) हरवले. पॅलेस्टीनमध्ये सरकार स्थापने केले. 

     2007 Battle of Gaza (फतेह वि. हमास) हे अंतर्गत युद्ध झाले. या युद्धाने Palestine चे 2 तुकडे झाले. ◆एक israel च्या पूर्वेला तुकड्यांच्या स्वरूपातील PLO नियंत्रणाखालील West banK तर, ◆israel च्या पश्चिमेला हमासच्या ताब्यातील Gaza. त्यावर आता Palestine चा भाग असून देखील palestin चे नियंत्रण नाही.

     जेरुसलेमच्या पश्चिमेला Israel तर पूर्वेला Palestine आहे. आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार जेरुसलेम पॅलेस्टीनचे आहे. पण israel चा यावर दावा आहे आणि तेथील प्रदेशावर Israel ने कब्जा केल्याचे आरोप केले जातात.
       पूर्व जेरुसलेमधून पॅलॅस्टिनन लोकांची बळजबरी हकालपट्टी केल्याच्या विरुद्ध 7 May 2021 रोजी पॅलिस्टिन लोक आंदोलन करत होते. मात्र जेरुसलेमच्या अल अक्सा मस्जिदीमध्ये जमलेल्या पॅलिस्टिनी लोकांवर इस्त्रायली पोलीसांनी बळाचा वापर केला. आणि हे आंदोलन चिघळले.
        तसे पाहत हमास व पॅलिस्टीन यांचे काही लागेबांध नाहीत. मात्र हमासने, पॅलिस्टिन लोकांचे स्वघोषित प्रतिनिधी म्हणून इस्त्रायली पोलिसांनी केलेल्या कृतीविरुद्ध इस्त्राइलला क्षेपणास्त्र हल्ला करू अशी धमकी दिली. आणि तशी क्षेपणास्त्र  डागली देखील. इस्त्राइलकडे असलेल्या 'Iron Dom' मुळे तुलनेने तेथील जीवितहानी कमी आहे. मात्र इस्त्राईलने केलेल्या प्रतिहल्ल्यात जगाला हेलावून टाकणारी परिस्थिती निर्माण झाली. पॅलिस्टिन लोकांचे नाहक बळी गेले. यात लहान मुलांचाही समावेश आहे. आणि ही पहिली वेळ नाही. या प्रदेशात अशा हिंसक घटना घडतच आहेत.
      हिंसक प्रश्नांना हिंसात्मक मार्गाने सामोरे जाऊन प्रश्न सुटत तर नाहीच. याउलट परिस्थिती अधिक हृदयद्रावक होते. 11 दिवसांच्या मृत्यू थैमानानंतर Israel- हमास मध्ये युद्धबंदी (cease fire) ची घोषणा झाली आहे. मात्र हा दिर्घकाळ उपाय आहे का ? नसेल तर यासाठी कायमस्वरूपी उपाय शोधण्याची व तो अंमलात आणण्याची हीच वेळ आहे.
      लोकांच्या संरक्षणासाठी, हक्कांच्या सुरक्षिततेसाठी राज्य, देशाची निर्मिती केली गेली आहे, पण आज मूळ मुद्दा बाजूला राहीला, आणि हे देश सीमा व प्रदेशांसाठी लढत आहेत. जगात माणूस आणि माणुसकीच शिल्लक नाही राहिले तर काय करणार आहोत अशा साम्राज्यांचं...??

२२ मे, २०२१

'जरा'च विसावू 'त्या' वळणावर...!!!

            'माणूस हा समाजशील प्राणी आहे' याचा प्रत्यय पदोपदी येत असतो. आपल्या सभोवती खूप सारी माणसं भावना व्यक्त करत, आनंद दुःख झेलत जगत असतात. त्यात कळत नकळत, प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे आपणही सहभागी असतो. एवढ्या सगळ्या माणसांत असूनही एकटेपणा जाणवतो. सगळं व्यवस्थितच चालू असतं, पण मन खूप त्रासदायक... माणसाला स्वस्थ राहू देत नाही. कधी विनाकारण अस्वस्थ होईल, कधी आनंदाने ओसंडून जाईल याचा वेध लागला तरच नवल नाही का...!

            एकटेपणात अस वाटत आयुष्य एखाद्या नवीन, अनोळखी अशा वळणावर येऊन ठेपलं आहे. म्हणून कदाचित, त्या वळणापर्यंत सोबत करणारी पूर्वीची आपली माणसं आणि वळण पार केल्यानंतर पुढे असणारी माणसं दिसत नसतील..., त्यालाच आपलं भाबड मन एकटेपणा समजत असेल...!!!

            नियतीने पुढे काय मांडलंय हे 'ते' वळण पार केल्याशिवाय नाही कळणार ना! त्यामुळे अशा वळणाला अंत न समजता केवळ 1 विसाव्याची जागा म्हणून तिथून पुढे जाता आलं पाहिजे. वळण्यासाठी प्रोत्साहन देणारी आणि वाळल्यानंतर स्वागत करणारी खूप माणसं वळणाच्या मागे पुढे उभी असतील.., मात्र वळण आपल्याला आणि आपल्याच हिम्मतीने, आत्मविश्वासाने पार करावं लागतं. त्यामुळे न थांबता "जरा'च विसावू त्या वळणावर'....!!!!



२० मे, २०२१

So called एकता, बंधुता, समता


         माणसाच्या जिवन जगण्याच्या ना खूप वेगवेगळ्या तऱ्हा आहेत. कुणी इतरांसाठी जगतो, कुणी फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी. काही जण अगदी निखळ, निस्वार्थी भावनेने, आत्मिक समाधानाने समाजाच्या दृष्टीने आयडियल असे जीवन जगत असतात. पुण्यातील "Z bridge" नावाच्या 'पुलाखाली' मात्र काही लोक असे आहेत, जे मृत्यू माणसाच्या हातात नाही... आणि जन्म तर त्याहून नाही. आणि पदरी पडलेल्या दुर्दैवी जगण्याला दुसरा नाही म्हणून कुढत कुढत जीवन जगतात.
         बघा ना नियतीची करणी..., त्याच bridge "वर" आपल्या प्रेमाची फक्त चैन पूर्ण करण्यासाठी पैसे उधळणारे प्रेमी युगुल आहे, तर "खाली" या पैशासाठी आपल्या माईचा प्रेमळ पदर सोडून त्याच पैशासाठी दिवसरात्र वणवण आहे. किती हा विरोधाभास ना !
         या लोकांना पाहिलं की, प्रश्न पडतो यांना जीवनाचा अर्थ माहिती आहे का? आपण स्वप्नांशिवाय जीवन जगू शकत नाही. पण इथे स्वप्न म्हणजे काय तेच माहित नाही. आपल्याकडे बाळ बोलायला लागल्यावर त्याला आई, वडिल, आजी आजोबा बोलायला शिकवले जाते. मात्र इथे 10 वर्षांच्या मुलाला त्याच्या जन्मदात्याच नाव ही माहिती नाही !
        एक फार गमतीची गोष्ट जाणवली, त्यांची नावं राम, लक्ष्मण, हनुमान, सरस्वती, सीता अशी आहेत. जणू (गरीब) देवांची पंढरीच ती...! पण त्यांना कोण सांगणार ना, की, या जगात देवाच्या केवळ नावाने देववैभव प्राप्त होत नाही... पोटाची खळगी भरण्यासाठी जेव्हा 3-4 दिवसांच बाळ टाकून आईला कामावर जावे लागते, तेव्हा विश्वास दृढ व्हायला लागतो की 'देव' वगैरे सगळ अंधश्रद्धा आहे.
        11-12 वर्षाच्या मुलींना काय कळणार लग्न....? कसला करणार त्या संसार....? पण इथे अस्संच होतं. नाचण्या-बागडण्याच, भातुकली खेळण्याचं तींच वय... बाहुलीचं लग्न लावता लावता ती स्वतः च बाहुली होऊन जाते. आणि... बाहुलीचा चुल आणि मुलांचा संसार कधी तिचा होऊन जातो तिलाही कळत नाही... यांना प्रश्न विचारला तुम्हाला शिक्षण घ्यावसं नाही वाटत का? ते म्हणतात शिकताना काय पैसा मिळतो काय! हे उत्तर म्हणजे मला तर, कोणत्या ही सुशिक्षित भारतीयाला अक्षरश: शालजोडे मारल्यासारखे वाटते!
        यांना एवढचं माहिती आहे की आपल्याला भूक लागते, भूक लागल्यावर दोन घासांसाठी सुद्धा पैसाच लागतो!!! मात्र तो  मिळवण्यासाठी माध्यम निवडण्याचा पर्याय यांच्याकडे नाही. मिळेल ते काम करून 10-20 रूपयांसाठी झगडणे हेच त्यांचं आयुष्य. इथल्या भाबड्या लहानग्यांना आपल्याला 2000 रुपयांची नोट फक्त पाहायला मिळू शकते या नुसत्या कल्पनेनेच बावरायला होतं. आपण ज्या संस्कृतीच्या उपासक, विकसनशील, शिस्तप्रिय देशाचं गुणगाण गात जगभर मिरवतो ना... तो स्वतःचा देश "भारत"/ "India" देखील यांना माहित नाही, यापेक्षा दुसरे दुर्दैव ते काय...!
       जर भारत सुधारला म्हणजे प्रगतशील झाला असं वाटल ना, तर अर्धा तास Z bridge खाली येऊन बसायचं, वास्तवाची जाण होईल.
        खरचं, भारतातील दारिद्रय, उपासमार, कुपोषण, बालविवाह या एक ना अनेक समस्यांचं हुबेहूब चित्र इथं रेखाटलं आहे. Z bridge "वरून" बऱ्याचदा गेले असाल, एकदा खाली चक्कर टाका म्हणजे so called विकसनशील भारताचं खरं रूप पाहून डोळयांत क्षणभर का होईना पाणी तरळेल, अर्थातच संवेदनशील असाल तर!
        असो, हा झाला पुण्यातील डेक्कन शेजारचा 1 Z bridge. असे भारतात किती Z bridge आणि किती अशी लोक आहेत कोण जाणे?
        त्यांना दिवाळीचा फराळ, फटाके, चॉकलेट्स, ब्लॅकेट्स, कपडे देवून..., सहानुभूती देवून...दुबळा भारत बनवण्यापेक्षा, प्रत्येकाने एकाला एक तरी स्वप्न, इच्छा, आशेचा किरण दिला पाहिजे. तर कुठेतरी भारताची बंधुता, एकता, समता ही 'फक्त सांविधानिक' तत्त्वे अस्तित्त्वात यायला लागतील !!!

१८ मे, २०२१

मी आणि शाळा

           शाळेची भिती कधी वाटत नव्हतीच, शाळा म्हणजे दुसरं घरचं जणू! उत्सूकतेला मात्र मर्यादा उरली नव्हती कारण, मी आता मोठ्या वर्गात जाणार होते. नविन गणवेश, दप्तर, पुस्तक याचा तर आनंद होताच. तरीही शाळेच्या पहिल्या दिवशी मन धडधडतच होतं...! तस पहायला गेलं, तर आम्ही सर्व 4 थी चे विदयार्थी एकाच शाळेत, एकाच वर्गात होतो पण, मन भोळं घाबरतच होतं. आत्तापर्यंत दिवसभर एकच शिक्षक शिकवायचे. मात्र, इथे दर अर्ध्या तासाला घंटा वाजली की शिक्षक बदलायचे, याच तर नवलच निराळं!

            मला मराठीचा तास जरा जास्तच आवडायचा. कदाचित, जन्मतःच माझी मराठीशी नाळ जोडली गेली असेल! आम्हाला 5 वी मध्ये 'मला आवडते केली वाट वळणाची' ही कविता शिकवली होती आणि दुसऱ्या दिवशी ती सहाभिनय वर्गात सादर करायची होती. मला वाटतं, तो दिवस सगळ्या classmates ना चांगला आठवत असेल.

          अजून एक सारखी आठवणारी गोष्ट म्हणजे,- शाळेत परवानगी नसताना सर्वांनी वर्गात रंगपंचमी साजरी करून वर्गाचा चेहरामोहराच बदलला होता. त्यानंतर सरांनी चांगलाच चोप दिला होता ती गोष्ट सोडा..., आणखी एक वर्गातली गमतीशीर गोष्ट म्हणजे, गव्हाबरोबर खडे रगडले जात. विशेषत: खेळाच्या तासाला, चुक जरी काहीजणांची असली तरी प्रसाद सगळ्यांनाच मिळायचा. पण, हळूहळू जशा इयत्ता वाढू लागल्या, तसे मुली शांत, हुशार, अभ्यासू आणि मुलं मात्र आगावू, भांडखोर, चेष्टेखोर असं काहिसं झालं

           का कोण जाणे पण आमच्यात मुला मुलींच कधी जमलच नाही. अक्षरशः ३६ चा आकडा ! हा मात्र याला एक गोष्ट अपवादात्मक- शाळेचे क्रिडा सप्ताहाचे दिवस!!! आनंदोत्सवच म्हणा ना. मला चांगलच आठवत की, मुली कधी खो-खो च्या पुढे गेल्या नाहित आणि पोरांनी एक खेळ खेळायचा सोडले नाही!     

 मुला-मुलींनी मिळून केलेली खो-खो ची Practice, फेब-मार्च मधील सकाळची शाळा, रक्षाबंधन, ground वरचा वर्ग, जागा पकडण्याची धडपड या गोष्टी आठवल्या की उगाच मोठे झालो, असं वाटतं. मात्र यावेळी, मला.. "बदल हा निसर्गाचा नियमच आहे" हे एका सरांनी माझ्या माथी मारलेले वाक्य आठवले. असो, या आठवणी एवढ्यावर थांबणार नाही. 

         माझ्यासाठी शाळा ही नेहमीच आनंद, उत्साह, जिद्द, स्पर्धा, आस्थेचे प्रेरणास्थानचं! 

           वयक्तिक आयुष्यासाठी शाळेने मला खूप काही दिलं. अगदीच माझ्यातली मी ओळखायला शाळा आणि अर्थातच वंदनीय शिक्षक यांचा वाटा आहे हयात वावगं काही नाही. थोडक्यात, स्वतःची आवड, छंद, कला ओळखायला आयुष्य निधुन जातात, तिथं माझ्या शाळेने जगाच्या स्पर्धेत उतरण्या आधीच माझ्यातला शस्त्रांना धार लावून लढण्यास सज्ज केलं!

         कितीही नाकारला, तरी शाळा, शाळे तील मित्र-मैत्रिणी यांच्याप्रती जी आपुलकी आहे, ती कॉलेजमध्ये कितीही मोठं Friend circle असलं, तरी ते दिवस आणि आपुलकी विरळाचं!

नाही का... !!!

इस्राईल- Palestine

      हिटलरने ज्यू धर्मीयांचा कसा छळ केला, घृणास्पद वागणूक दिली  हे आपण जाणतो. मात्र ज्यूंविषयी हे अत्याचार वर्षानुवर्षांपासून  चालत आलेत. म...

Most viewed