एकीकडे परिवर्तनाची कास धरून वाईटाला विरोध आणि योग्य गोष्टीला सामर्थ्य पुरवत मौनांची अंतरे पार करू पाहणारी संवेदनशील लोकांची फळी आहे ,तर दुसरीकडे याच संवेदना पायदळी तुडवत पुरुषी अहंकार अन अज्ञानाचा नंगा नाच सुरु आहे.
अशा वेळी खरी कसोटी असते ती या दोघांच्या मधल्या फळीची.एकीकडे तुमच्या ज्ञानाची, सहनशीलतेची, स्वाभिमानाची परीक्षा, तर दुसरीकडे विकृतींचं व कुबुद्धीचं मनोरंजन. तुमच्या हातात असतं तुम्ही त्या परिस्थितीत मूग गिळून, मठ्ठपणे, निर्बुद्धपणे सगळं पाहत राहायचं की माणसाचं लक्षण ओळखून, माणुसकीला जागून, अन्याय-अत्याचाराविरुद्ध स्वतःला सिद्ध करायचं!
भले मग अशा वेळी वाटेत काटे येतील,नव्हे वाटच काटेरी असेल! तेव्हा निर्धार, विश्वास, सहनशक्तीच्या फांद्या इतक्या मोठ्या करा की काटेरी वाटाही झुकतील! सगळे जेव्हा या वाटांवरून जातील, तेव्हा काटेच बोथट होऊन जातील!!!
म्हणून अशा काटेरी, न वापरलेल्या जाणाऱ्या, अंधाऱ्या, वाईट समजल्या जाणाऱ्या वाटा पायाखाली आल्या की, होणारच-सुरळीत, मऊ, मखमली!!!
सांगण्याचा मतितार्थ हाच की, समाजातही अशा काही गोष्टी, रूढी,( गैर) समज आहेत, ज्यावर वर्षानुवर्षे मौनाचे व्रत चालू आहे. त्यामुळेच या गोष्टींबद्दल "काटेरी वाटांप्रमाणेच" गैरसमजुती अन myth पसरले आहेत.
परंतु आज या वाटा पूर्ववत करण्यासाठी अनेक वाटाडे सज्ज होऊन मार्गस्थ झाले आहेत. यातील एक वाट जाते, "महिलांच्या मासिक पाळी" कडे! मुळात याबद्दल पहिला मुद्दा म्हणजे किती विरोधाभास बघ ना, प्रत्येक महिन्याला या वाटेवरून जाऊनही या वाटेवर ही अविचाराची जळमटे का??
स्त्रीच्या शरीरातील अंडपेशींचे फलन न झाल्यास ही अफलीत अंडपेशी रक्त व म्युकस सहित स्त्रावाच्या स्वरूपात गर्भाशयाबाहेर टाकली जाते. ही प्रक्रिया 3-5 दिवसांची असू शकते. आणि हि नैसर्गिक प्रक्रिया म्हणजेच मासिक पाळी.
ज्याप्रमाणे आपले शरीर वेगवेगळ्या दैनंदिन क्रिया-प्रक्रियांना प्रतिसाद देत असते, जसे पचन, रक्ताभिसरण, श्वसन याचप्रमाणे मासिक पाळी ही केवळ एक, स्त्रियांच्या शरीरात होणाऱ्या बदलांची क्रिया आहे..!
मात्र याकडे आपल्या अज्ञानी समाजाने एक अपवित्र गोष्ट म्हणूनच पहिले. मासिक पाळी चालू असणाऱ्या महिलेला केवळ अवहेलना, कुचेष्टा, लाजिरवाणी वागणूक आणि दुर्लक्षितपणा हेच भोगावे लागते. 4दिवसात जेव्हा तिच्या आरोग्याची काळजी घेणे, स्वच्छता राखणे गरजेचे असते, तेव्हा तिला घराच्या एखाद्या न वापरल्या जाणाऱ्य, अस्वच्छ, अंधाऱ्या, कुबट कोपऱ्यात टाकले जाते. या 4 दिवसात तिने जवळ जवळ घरच्यांशी संबंधच ठेवायचा नसतो म्हणा ना....
आणि हेच सारं विटाळाच अनिष्ठ पाळत आपण आजवर जगत आहोत. या गोष्टीच गांभीर्य कधी आपण मानलच नाही. मासिक पाळीच्या वेळी, ती सुरु होण्यापूर्वी मुलींना त्याबद्दल माहिती करून देणे, आरोग्य व स्वच्छतेबाबत काळजी कशी घ्यावी याबाबत मार्गदर्शनाची गरज असते... पण आपल्या समाजाच्या या उलट्या गंगेत मात्र, याबाबत गुप्तता कशी पाळावी, हे सगळं कसं अपवित्र आहे, यासंबंधी चालीरीती कित्ती कटाक्षाने पळवायला हव्यात याचीच सुमने वाहिली जातात, ही एक दुर्दैवाचीच गोष्ट....!
पहिल्यांदा जेव्हा एखाद्या नकळत्या मुलीला पाळी येते, तेव्हा तिच्या मनात अनेक प्रश्नांची काय घालमेल होत असेल....याच्या विचारानेच मन कासावीस होते. योनीमार्गातून अचानक त्रासदायकपणे रक्तस्त्राव होणे म्हणजे आपल्याला काही महाभयंकर आजार झाला आहे का?, आपण प्रेग्नेंट तर नाही ना???? अशा प्रश्नांनी हैराण होऊन जात असेल ती.....
अशा वेळी गरज असते त्या मुलीला तिच्या सोबत होत असलेल्या शारीरिक बदलांची जाणीव व माहिती करून देण्याची. आणि ही जबादारी असते, तिचा त्या वयातला ज्ञानाचा स्रोत असणाऱ्या शाळा, घर, नातेवाईक किंवा एकूणच अनुभवकर्त्यांची. मात्र.... आपल्याकडे या विषयावर घरातच काय, कुठेही बोलने अगदी निशीद्ध!!! उपाय म्हणून शालेय विज्ञानाच्या अभासक्रमात मासिक पाळीचा भाग समाविष्ट केला, तर शिक्षकांनी रुढींच्या कर्तव्य पालकांप्रमाणे अगदी इमानदारीने हा भाग शिकवण्यातून गाळून टाकला! केवढी मोठ्ठी ही शोकांतिका आपल्या शिक्षण व्यवस्थेची...
महिलांना बरेच आजार हे मासिक पाळीच्या वेळी स्वच्छता न राखल्याने किंवा त्याबद्दल पुरेशी माहिती नसल्याने होतात. यातून पुढे जाऊन महिलांना गर्भाशय काढून टाकणे वगैरे अशा गोष्टींना सामोरे जावे लागतते. त्यामुळे स्त्रियांचे आयुष्य वाढवायचे असेल, त्यांना प्रगतीचा मोठा भागीदार बनवायचे असेल, तर त्यांच्या आयुष्याचा मोठा भाग असणाऱ्या मासिक पाळीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
याची सुरुवात घरातूनच झाली पाहिजे. घरातील पुरुषांनाही याबद्दल माहिती असली पाहिजे. तुमच्या घरात जेव्हा तुम्ही तुमच्या नव्याने मासिक पाळी चालू होणाऱ्या मुलीला याबद्दल माहिती देता, तेव्हा मुलाला देखील त्याबद्दल संगण्याइतपात मोकळीक,समज आता यायला हवीच. कारण, असे दिसून येते की बऱ्याच पुरुषांच्या नजरेत मासिक पाळी म्हणजे-स्त्रियांचा विषय, एक आजार, दुर्लक्ष करण्याचा विषय, न बोलणेच बरे...वगैरे वगैरे असं आहे....
या दृष्टिकोनाला जबाबदार कुठेतरी स्त्रीयादेखील आहेत. कारण,एखादी गोष्ट तुम्ही जितकी लपवून, रहस्यमय ठेवता तेव्हा त्याबद्दल कुतूहल किंवा अनर्थ निर्माण होणारच. आणि त्यातूनच मग अशा गैरसमजांचे पेव पसरत जातात. दुसरी गोष्ट म्हणजे पुरुषांनीही दृष्टिकोन बदलून याकडे गांभीर्य, जाणीव, संवेदनशीलतेने बघणे गरजेचे आहे.
अर्थात परिस्थिती बदलत आहे, वाट बऱ्यापैकी साफ झाली आहे मात्र अजूनही पूर्ण नाही! मुलींनीही girls problem, secrets म्हणून हया बद्दल बोलणे टाळणे टाळावे. कारण ही गुप्तता दूर झाल्याशिवाय मासिक पाळी व त्यासंबंधित आरोग्य, स्वच्छता,आजार याबद्दल मुक्त चर्चा होणारच नाही....म्हणून या सामान्य गोष्टीला जे असमान्यतेचे आवरण चढले आहे ते दूर करून, 'स्त्रीला'- पुरुष व स्त्रिया दोघांनीही 'मासिक पाळीसह' स्वीकारणे आवश्यक आहे......!
Photo curtecy-Akanksha mote |
👏👏💯truth
उत्तर द्याहटवाThanks
हटवाखूप छान
उत्तर द्याहटवा